माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सारखा सण पण होवून गेला, तरी पण माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. श्रावण महिन्यातील ऐन सणासुदीच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हे महत्त्वाचे सण अंधारात जात आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते विलंबाने जाणार आहेत. त्याला सर्वस्वी कारणीभूत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी जबाबदार आहेत.अचानक 31 जुलैला रजा टाकून त्या रजेवर गेल्याने, अद्याप पर्यंत पगार झालेला नाही.खरतर रजेवर जाण्यापूर्वी रीतसर पगार बीलांवर सही नसल्याने समस्या निर्माण होणार आहे.हे कविता शिंपी यांना माहित होत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुस्काटदाबी कशी करता येईल? हेच उद्दिष्ट ठेवून त्यांनी रजेवर जाण्याच ठरवलेल आहे. त्यामुळे शिक्षकांना वेठीस धरण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करून हायगय केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कडक कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्यवाह नंदन घोगळे आणी कोकण विभागाचे कार्याध्यक्ष सलीम तकिलदार यांनी केली आहे. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र घेबुडकर यांनी ही कारवाई करावी अशी लेखी मागणी शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती भरत केसरकर आणी नंदन घोगळे यांनी दिली आहे.