सिंधुदुर्गनगरी:
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची शपथ घेत समाजात शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, दहशतवाद ही मानवतेसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती असून त्याचे परिणाम संपूर्ण समाजावर होतात. समाज माध्यमांमध्ये समाजविघातक विचार पसरविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग राहून चुकीच्या माहितीपासून सावध राहणे आवश्यक आहे. समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. युवकांनी सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर करावा तसेच देशविघातक आणि हिंसक प्रवृत्तींना वेळीच रोखावे. राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कार्यक्रमात दहशतवादमुक्त, शांततामय आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, आरती देसाई, प्रतिभा वराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
