तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केला यथोचित सन्मान

मालवण प्रतिनिधी:
तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोमसाप मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी स्वतः उपस्थित होते. यावेळी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात कोमसाप सदस्यांनी हॅट्ट्रिक केल्याने ठाकूर गुरुजींनी त्याच सभागृहात कोमसाप मालवण शाखेच्या वतीने सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, उज्ज्वला धानजी आणि द. शि. हिर्लेकर गुरूजींच्या वतीने सन्मान स्वीकारणारे त्यांचे पुत्र शशांक या त्रयींचा शाल, श्रीफळ आणि गोड भेटवस्तू देत यथोचित सन्मान केला. यावेळी वि. स. खांडेकर मंच तथा कोकण संस्था कोल्हापूरचे सचिव मोहन गावकर, आकाशवाणी केंद्र सिंधुदुर्गचे निवृत्त अधिकारी कहाळेकर, श्री चंद्रशेखर धानजी, कुमारी अपर्णा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह”, मालवण शाखेच्या सदस्या सौ. उज्ज्वला धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” लेख संग्रहाला “सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह” आणि ज्येष्ठ सदस्य श्री दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरुजी यांच्या “कर्तव्यपूर्ती” ला “सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र” असे तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. कोमसाप मालवण शाखेने केलेल्या सन्मानाने तिन्ही पुरस्कारप्राप्त साहित्यिक भारावून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top