आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटीची मदत जाहीर

आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा आद्यादेश जारी

कुडाळ प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या आत राज्य शासनाने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा जि. प. सदस्य दीपक नारकर, जि. प. माजी अध्यक्ष श्री. काका कुडाळकर, कुडाळ प. स. सभापती मिलिंद नाईक, कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका सौ. नयना मांजरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. अरविंद करलकर, नगरसेविका तथा शिवसेना शहरप्रमुख सौ. श्रुती वर्दम, सौ. रेवती राणे, कडावल उपसरपंच तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. स्वरूप वाळके कुडाळ
सोशल मीडिया प्रमुख राजवीर पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

दादा साईल म्हणाले, काल संध्याकाळी उशिरा जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाणार आहे.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रती हेक्टर २२,५०० रुपये दराने ही मदत वितरित केली जाणार असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे. या शासन निर्णयाचा लाभ ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील पाच जिल्ह्यांतील १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार आहे. एकूण ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ग्राह्य धरून मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९८.४४ कोटी रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७९.०५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

आ. निलेश राणे यांनी गुरुवारी कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांची समस्य अभ्यासपूर्ण, आक्रमक व बेधडक शैलीत मांडत सभागृह हलवून सोडले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना धारेवर धरत छापील माहिती आणि बागायतदारांची प्रत्यक्ष स्थिती, कृषी विद्यापिठ्ने केलेला सर्वे अशा

वेगवेगळ्या मुद्यांवर वस्तुस्थिती मांडली. आ. निलेश राणे यांच्या अभ्यासू पद्धतीने मांडलेल्या विषयामुळे
अखेरीस अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली. यामुळे आमदार निलेश राणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. २०१३ नंतरची अश्या प्रकारची ही पहिलीच नुकसानभरपाई आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली असून खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा व प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

आ. निलेश राणे यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्यानंतर तातडीने शासन निर्णय जाहीर झाल्याने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळ नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा निर्णय कोकणातील फलोत्पादकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक वर्षांनंतर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपन्यांची रक्कम यात जोडलेली नाही, ती रक्कम दुसऱ्या टप्प्यात येणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील,

आमदार दीपक केसरकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top