आंबोलीत वाहतूक कोंडीला लगाम; आठ दिवसांत वाहनतळ, धबधब्यासाठी ई-वाहन सेवा सुरू होणार

पर्यटकांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; एमटीडीसीच्या जागेत प्रथम टप्प्यात ७० ते ८० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था

सिंधुदुर्गनगरी:
आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विभागाच्या जागेत वाहन पार्किंग व्यवस्था उभारण्यासह धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ई-वाहन सेवा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ही पार्किंग व्यवस्था येत्या आठ दिवसांत कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.

आंबोलीतील वाहतूक, पर्यटक सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, दत्तू नार्वेकर, तसेच वन, पर्यटन आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ.दहिकर यांनी आंबोलीतील सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. आंबोली धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून अनेक पर्यटक आपली वाहने रस्त्यालगत दीर्घकाळ उभी ठेवतात. घाटरस्ता असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येवर उपाय म्हणून घाटाच्या सुरुवातीला तसेच वरच्या भागात स्वतंत्र वाहनतळ उभारण्याची सूचना त्यांनी केली.

यावर निर्णय घेताना पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबोली घाट रस्त्यालगत असलेल्या एमटीडीसीच्या जागेत तातडीने ७० ते ८० वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील टप्प्यात वन विभाग किंवा अन्य उपलब्ध खाजगी जागांचा अभ्यास करून अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top