सिंधुकन्या मैत्रेयी आपटेचा राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत डंका!

पुणे येथील स्पर्धेत ठरली अव्वल, रोख रक्कमेसह मानाचे पारितोषिक व मानचिन्ह प्रदान.

पुणे :
येथील सर परशुराम भाऊ महाविद्यालय आयोजित कै. डॉ. पी. जी. सहस्रबुद्धे राष्ट्रीय पातळीवरील आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कन्या मैत्रेयी मकंद आपटे हिने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये मैत्रेयीने आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने उपस्थित रसिक व परीक्षकांची मने जिंकली. “प्रदीर्घ युद्धे: संघर्ष निवाऱ्यापासून ते आक्रमकतेपर्यंत” या गंभीर व चिंतनशील विषयावर तिने मांडलेले परखड विचार विशेष ठरले. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये देशातील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मैत्रेयीची कामगिरी सर्वाधिक उठून दिसली.
या यशाबद्दल तिला ५००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मैत्रेयी ही कणकवली (ता. कणकवली) येथील रहिवासी असून तिचे माध्यमिक शिक्षण कणकवली येथे पूर्ण झाले आहे. सध्या ती पुणे येथील सर परशुराम भाऊ महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत असून नाट्यशास्त्राचा विशेष अभ्यास करीत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहिते, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी तिच्या यशाचे कौतुक केले आहे. मराठीचे प्राध्यापक श्री. कुबलकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिचे वडील मकंद आपटे (शिक्षक, कणकवली हायस्कूल) व आई सौ. मानसी आपटे यांचेही तिला मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे.
मैत्रेयीच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top