पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार: भाजप राज्य युवा नेते विशाल परब यांचे मोठे अभिवचन
सावंतवाडी:
निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली आता केवळ धबधबे आणि धुक्यापुरते मर्यादित न राहता, क्रीडा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आपली नवी ओळख निर्माण करत आहे. रिमझिम पावसाच्या सरी, धुक्याची दुलई, सह्याद्रीच्या हिरवाईची चादर आणि धावपटूंची अथांग जिद्द अशा निसर्गरम्य वातावरणात आंबोलीत आयोजित ‘मान्सून मॅरेथॉन’चा दिमाखदार सोहळा पार पडला. सलग तिसऱ्या वर्षी पार पडलेल्या या स्पर्धेने यंदा महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील क्रीडारसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम (आंबोली-सांगेली) व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त आयोजनातून आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वातून या मॅरेथॉनचे अत्यंत दिमाखदार आणि नेटके आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या भव्य उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी आंबोलीच्या क्रीडा पर्यटनाला नवी दिशा देणारा संकल्प जाहीर केला. आंबोली हे केवळ प्रेक्षणीय पर्यटनस्थळ राहिलेले नसून आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्सून मॅरेथॉन आयोजित करणारे महत्त्वाचे क्रीडा केंद्र बनले पाहिजे, असा विश्वास व्यक्त करत कोकणातील ‘हिडन टॅलेंट’ जगासमोर आणण्यासाठी आणि स्थानिक गुणवत्तेला भक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यास भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
या सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिकाताई परब, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिनेश गावडे,पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, आंबोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बाबल अल्मेडा, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पदाधिकारी व आंबोली पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिकाताई परब यांनी सांगितले की, यंदाच्या स्पर्धेत महिला धावपटूंची उपस्थिती अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून ऊर्जा घेत अनेक ‘रणरागिणींनी’ आंबोली मॅरेथॉन गाजवली आहे. अशा स्पर्धांमुळे आरोग्यदायी आणि सुदृढ जीवनशैलीला मोठी चालना मिळते.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक धावपटूंमध्ये अफाट क्षमता असूनही मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचण्याची संधी त्यांना मिळत नाही. हीच दरी भरून काढून भविष्यात कोकणातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, या व्यापक हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धावपटूंची नोंदणी, स्वागत, मार्गावरील वैद्यकीय आणि रेस्क्यू सुविधा, सुरक्षितता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन विशाल सेवा फाउंडेशन व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने केले. आंबोलीच्या चढ-उताराच्या घाटरस्त्यावर पावसाच्या सरी झेलत धावणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या उत्साहाने संपूर्ण परिसराला भारावून टाकले होते. यंदाचा उदंड प्रतिसाद पाहता, आंबोलीच्या या मान्सून मॅरेथॉनने आंतरराष्ट्रीय झेप घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून, यामुळे आगामी काळात स्थानिक पर्यटन, रोजगार आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार आहे.
