मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये..

३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण..

सावंतवाडी:
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. या विभागीय फेरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी-कलाकार विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.

युवा महोत्सवाच्या माध्यमातून संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा विविध ५ विभागांतील स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी, पोस्टर निर्मिती, कोलाज आणि मातीशिल्प अशा विविध कलाप्रकारांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचा हा युवा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा मानाचा उपक्रम मानला जातो. या विभागीय फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

महोत्सवाचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि कागदपत्र पडताळणी गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून केली जाणार आहे. तर मुख्य स्पर्धा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० ते रात्री ९.३० या वेळेत रंगतील. याशिवाय मराठी, हिंदी व इंग्रजी कथा लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.

या महोत्सवाच्या संदर्भात आयोजित पत्रकारपरिषदेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि युवा महोत्सव को-ऑर्डिनेटर प्रा. बॉनी शेरॉव्ह, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये उपस्थित होते. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी पत्रकारपरिषदेत केले.

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, युवा महोत्सव को-ऑर्डिनेटर प्रा. बॉनी शेरॉव्ह व प्रा. स्वागत केरकर यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या कार्यरत असून महोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top